रानी की वाव
दक्षिण भारतात समुद्राच्या सीमा ओलांडून चोल राजे आपला पराक्रम गाजवत होते, महाराष्ट्रात यादवांचं राज्यं अत्यंत बळकट होतं त्याचवेळेला गुजरात मध्ये सोळंकी घराण्याचा विस्तार वाढत होता. या घराण्यानी केलेल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीमुळे, सोळंकी साम्राज्याच्या सीमा सर्वदूर पसरण्यासाठी खूप मोठी मदत झाली. याच काळात भारतभरात विविध राजघराणी अनेक सुंदर सुंदर स्थापत्य उभी करत होती. स्टेप-वेल (पायऱ्या असलेली विहीर) अशी साधी वाटणारी संकल्पना काळाच्या ओघात अत्यंत अवघड पण खूप सुंदर अशा स्थापत्य शैलीमध्ये परावर्तित झालेली दिसते. धोलावीरा इथे झालेल्या उत्खननात अशा प्रकारचं स्थापत्य आपल्याला बघायला मिळतं. पाण्याच्या साठ्यापर्यंत जाण्यासाठी केलेली मानवनिर्मित सोय या सुरवातीच्या कल्पनेपासून या स्थापत्याचा मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला गुजरात मध्ये बघायला मिळतो.
राणी उदयनमती हिने सोळंकी राजा आणि पती भीमदेव (पहिला) याच्या स्मरणार्थ पाटण येथे, सरस्वती नदीच्या काठी हे स्थापत्य घडवायचा निर्णय घेतला. अकराव्या शतकात तयार झालेली हि रानी की वाव १९६० सालापर्यंत संपूर्णपणे नदीच्या पाण्याने आणि गाळाने भरलेली होती आणि कदाचित म्हणूनच परकीय आक्रमकांच्या नजरेतून हे स्थापत्य वाचले. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून हे सांस्कृतिक वैभव आपल्या सर्वांसाठी मोकळे केले. युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या जागेचा समावेश होतो.
पूर्वाभिमुख रचना असलेले हे स्थापत्य ६० मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. चार भागांमध्ये विभागले गेलेले हे स्थापत्य अत्यंत सुंदर अशा शिल्पांची अलंकृत आहे. खांबांच्या आधाराने बाल्कनी करून, वेगवेगळ्या उंचीवर आणि वेगवेगळ्या आकारात हे विभाजन केले आहे. यापैकी सर्वात खालचे दोन भाग हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले नुकसान आणि अतिउत्साही पर्यटक यामुळे बंद केले आहेत. पूर्वेकडून या विहिरीत उतरायला पायऱ्या बांधल्या आहेत तर पश्चिमेची बाजू ही डोंगराच्या कड्यासारखी सरळ असून त्यावर शेषशायी विष्णू मूर्ती कोरल्या आहेत.
रानी की वाव मध्ये विष्णू आणि विष्णूचे अवतार, शिव, दुर्गा, भैरव, सुरसुंदरी, योगिनी अशी अनेक शिल्पं कोरली आहेत. यापैकी काहींचा परिचय इथे करून घेऊयात.
भैरव
शंकराच्या रौद्र रूपांपैकी एक म्हणून भैरव समजला जातो. अनेक पुराणांमध्ये या संदर्भातल्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. या ठिकाणी असलेला भैरव हा १८ हातांचा आहे. वरच्या दोन हातांमध्ये पकडलेला साप, उजवीकडच्या हातांमध्ये असलेलं खङग, डमरू आणि तिथेच खाली प्रेताचा हात खाणारा एक गण दिसतो. डावीकडे खालच्या हातात केसांना धरलेलं डोकं आणि ते चाटणारं कुत्रं कोरलं आहे. बीभत्स तरीही सुंदर. अत्यंत बारकाईने कोरलेली केशरचना, गळ्यातले दागिने आणि कमरेच्या वस्त्रावर कोरलेली नक्षी लक्ष वेधून घेते.
वराह
विष्णूच्या दशावतारांपैकी हा तिसरा अवतार मानला जातो. या मूर्तीच्या स्थापनेमुळे राज्यप्राप्ती होते असे संदर्भ आपल्याला अग्नीपुराणात बघायला मिळतात. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवले आणि विष्णू वराहाच्या रूपाने प्रकट झाले, त्या राक्षसाचा संहार केला आणि पृथ्वीला वाचवले अशी ही कथा आहे. इथे असलेली मूर्ती ही शिल्पशास्त्राचे खूप सुंदर उदाहरण म्हणून बघता येईल. कमळावर पाय ठेऊन उभा असलेला, शंख, चक्र आणि गदा धारण केलेला, त्यानं जीला वाचवलं ती पृथ्वी कोपऱ्यातून दुमडलेल्या त्याच्या हातावर बसलेली आहे, असा ताठ उभा असलेला हा वराह अत्यंत रुबाबदार दिसतो. कमरेत खोचलेलं खंजीर आणि वस्त्रांवरचं नक्षीकाम कलाकारांनी खूप सुंदर केलं आहे. या मूर्तीच्या बाजूला छोट्या छोट्या देवकोष्ठांमध्ये विष्णूची इतर रूपे कोरली आहेत.
इंद्रनील सदानंद बंकापुरे
Indologist and Heritage Expert
(Fouder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
virasatheritage@gmail.com
No comments:
Post a Comment